"एकाच देवावर विश्वास ठेवा!"
(बसवण्णांची एक छान कहानी नक्की वाचा.)
बसवण्णां बालवयापासूनच हूशार होते. बसवण्णां सात वर्षाचे झाले होते. उन्हाळ्याचे दिवस होते. बागेवाडीतील गुरूगृही गेलेला बसव सूर्य डोक्यावर आला तरी परतला नव्हता. मादिराजाने घरगड्याला पाठविले. बसव आला तो धापा टाकीतच. घशाला कोरड पडली होती .त्याने आईला मोठ्याने ओरडून पाणी मागितले. आई तसेच बाबा देवपूजेत निमग्न होते. आई म्हणाली, " थांब हं थोडा वेळ ,मी सोवळ्याने देवपूजा करीत आहे. पूजा आटोपल्यावर पाणी देते." पुजागृहात प्रत्येक देव-देवतेची यथासांग षोडषोपचारे पूजा चाललेली होती.ती पाहून त्याला राग आलेला होता.बसवाला तहानेने धीर धरवत नव्हता. दाणदाण पावले टाकित परसदारीच्या अंगणात जाऊन खुरप्याने खडे खोदू लागला. दोन वीत खडा खोदल्यावर दुसरा खोदू लागे, तसाच तिसरा, चौथा असे करत करत १०-१२ खडे खोदून झालेले होते. तेवढ्यात ताम्हणातील पूजेचे पाणी व निर्माल्य विसर्जनासाठी मंदिराज बाहेर आले. मार्गात खोदलेले खडे पाहून म्हणाले - " "अरे बसवा, हे १०-१२ खडे कशासाठी ?"
बसव:- "मला तहान लागलेली आहे ना, पाणी मिळवण्यासाठी खोद्तोय. विहिरीत नाही का पाणी जमा होत?"
मादिराज:- "अरे, मग एकच नाही का खोदायचा? तोच खूप असेल तेव्हाच झरे लागतील ना ,तू १० नाही , २०-३० खडे खोदले तरीही झरे काही तुला प्रसन्न
होणार नाहीत."
बसव:- "अहो बाबा,देवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही नाही का गणेश, शिवलिंग, नंदी , विष्णू, अग्नी, सूर्यनारायण , नवगृह लक्ष्मी अशा अनेक देवदेवतांची पूजा करीत? तुम्हाला वाटते कोणता तरी देव प्रसन्न होइलच. म्हणून या ना त्या खड्यात कुठेतरी पाणी लागेलच ह्या उदेशाने मी एवढे खडे खोदले. परंतु एकाही खड्यात पाणी लागले
नाही . मग तहान कशी भागणार ?"
मादिराज त्या सात वर्षाच्या पुत्राकडे, त्याच्या चुरचुरीत बोलण्याकडे 'आ' वासून एकटक पाहतच राहीले.
- इंजि. कैलाश पाटिल.
( प्रदेश संघटक, लिंगायत सेवा संघ )