ANUBHAVA MANTAPA

ANUBHAVA MANTAPA

Sunday, November 29, 2015

महात्मा बसवन्नांची निवडक वचने - मराठी

।।१।।
हा कोणाचा , हा कोणाचा , हा कोणाचा असे नच म्हणवावे
हा आमुचा , हा आमुचा , हा आमुचा असेचि वदवावे
कुडलसंगमदेवा तुमच्या घरचा पुत्र म्हणावे

।।२।।
सधन बांधती देवालय, देवा गरिब मी काय करु ?
देहच माझे देवालय , देवळाचे खांब माझे पाय
मस्तक हे सुवर्णकलश , स्थावर पावे नाश
जंगम हे अविनाश , जाणा कुडलसंगमेशा

।।३।।
लोकांचे दोष , तुम्ही का सुधारु पाहता ?
आपआपली तनु आधी शांत करा, आपापले मन आधी शांत करा !
शेजार्याशी पाहूनि रडता कशाला ?
कुडलसंगमदेव भाळणार नाही, अशांचे केवळ रडणे पाहता

।।४।।
दिसेल त्याला पति म्हणणार्या कुलटेला, तीव्रता, सज्जन कसे म्हणता येईल ?
लिंगप्रसाद सेवन करुन अन्य देवतांची , स्तुती करणार्या दांभिकासाठी,
आमच्या कुडलसंगमदेवाने नरक निर्माण केला आहे

।।५।।
ज्याने आपल्या घामाने ही काळी माती भिजवली
कष्ट उपसलेत पोटासाठी आयुष्यभर,
अखंड श्रमाने ज्याने आपला देह राबविला,
ज्याने आपले तन, मन, श्रमपूर्वक झिजवले,
श्रमाची पूजा करुन ज्याने शिवाची पूजा केली,
श्रमिकांच्या झोपडीला जो कैलास मानतो
ज्याची कथनी तशी करणी असे कूडलसंगमदेवा , तोची जगदगुरु झाला ।।

।।६।।
करू नको चोरी, करू नको ह्त्या नको रागाऊ कधी, बोलू नको मिथ्या
अन्यांची कधी करू नको घृणा नको करू कधी कोणाची मानखंडना
करू नको कधी आत्मप्रशंसा हीच अरंगशुध्दी, हीच बहिरंगशुध्दी
कूडलसंगमदेवास प्रसन्न करण्याची हीच रिती ।।

।।७।।
वीर , विरक्त , भक्त म्हणवून घेणार्या भक्तांनो ऐका ,
वीर तोच आहे ज्याला शत्रुही मानतात ,
विरक्त तोच आहे ज्याला स्त्रियाहि मानतात ,
भक्त तोच आहे ज्याला जंगमही मानतात .
याप्रमाणे वागणार्याला मागेल ते पद देईल कुडलसंगमदेव ।

।।८।।
माझ्या पेक्षा लहान कोणी नाही, शिवभक्ता पेक्षा मोठा कोणी नाही ।
या साठी तुम्ही साक्षी आहात, माझे मन साक्षी आहे आहे ।
माझ्या साठी हेच प्रमाण आहे, कुडलसंगमदेव ।।

।।९।।
दयेविना धर्म तो कोणता ?  सर्व प्राणी मात्रांना दया पाहिजे
दया हेच धर्माचे मूळ आहे, अन्यथा जवळ घेत नाही कुडलसंगमदेव ।।

।।१०।।
मी काय करू कुडलसंगमा ? माझ्या मनरूपी माकडाचा गोंधळ वाढला आहे.
मला कोठेही थांबू देत नाही, मला क्षणभर बसू देत नाही,
क्षणात पाताळात घेऊन जाते, क्षणात आकाशात घेऊन जाते,
क्षणात दिशे दिशेला घेऊन जाते !
कुडलसंगमा, या मनरूपी माकडाच्या गोंधळातून वाचवून केंव्हा मला तुमच्या जवळ घेता !

।।११।।
आचार हाच गुरु आहे, आचार हेच लिंग आहे ;
आचार हाच जंगम आहे, आचार हेच प्रसाद आहे ;
आचार हाच भक्त आहे, आचार हाच शरण आहे !
आचारहीन गुरु, गुरु नसून नर आहे,
आचारहीन लिंग, लिंग नसून पाषाण आहे ;
आचारहीन जंगम, जंगम नसून वेषधारी अन्नभोगी आहे,
आचारहीन प्रसाद, प्रसाद नसून उष्टे आहे ;
आचारहीन भक्त, भक्त नसून भवी आहे,
आचारहीन शरण,शरण नसून मूर्ख आहे.
या सर्वाला मुळ सदाचारच आहे, कुडलसंगमदेव !

।।१२।।
अर्थरेषा असून काय उपयोग, आयुष्यरेषा नसेल तर ?
भित्र्याच्या हाती चंद्रायुध असून काय उपयोग ?
आंधळ्याच्या हाती आरसा असून काय उपयोग ?
माकडाच्या हाती माणिक असून काय उपयोग ?
आपल्या कुडलसंगांच्या शरणाना  न जाणणाऱ्यांच्या हाती लिंग असून काय उपयोग ?
शिवपथाची ओळख नसेल तर."

।।१३।।
फुटकी खापरी देखिल घरी न राही ऐसे करा हो,
द्या हो देवा माझ्या हातीगवताची काडी,
आणि जर मी 'मृडदेवा शरनु' म्हणत भिक्षा मागितल्यास,
तेथे 'पुढे जा' म्हणवा हो , कुडलसंगमदेवा ।।

।।१४।।
मी विषारी सापाला घाबरत नाहि, मी अग्नीच्या धगधगत्या ज्वालांना घाबरत नाही,
मी तलवारीच्या धारेला घाबरत नाही ,
पण मी परधन , परस्त्रीच्या स्पर्शाला घाबरतो कुडलसंगमदेवा ।

।।१५।।
जीवाच्या शिवालयामध्ये ईष्टलिंग हे लिंग स्थापून,
अज्ञानाचे निर्माल्य टाकून, सोहम भावाने पूजताना,
माझा भवरोग नाहीसा होऊन भवरहित झालो, अप्रमाण कुडलसंगमदेवा !

।।१६।।
शेतात राबवूनि तनू-मनू, आणुनि धन-धान्य,
दासोह करणाऱ्या परम सद् भक्ताचे चरण, दावी मज चिरंतन !
शुद्ध असे तयाची चाल शुद्ध असे मन, तयाची चाल शुद्ध बोली पावन !
तयास जो करी उपदेश, तो परम सदगुरु सर्वाधिश !
अशा सदभक्ताचे घरच कैलास !
हे उमजून जो तेथे करी लिंगार्चन, तोचि मंगल जगत् पावन !
कुडलसंगमदेवा, अशांना मी निष्ठेने करतो वंदन !

।।१७।।
धनाची आशा न धरिता चित्ती, प्राण्यांची न बाळगता भिती,
सा कोण आहे या जगती ?
आडमार्गे मिळाल्यास धन, तया नाकारती कां कोण ?
प्रमादश आल्यास मरण, खोटे बोल टाळती का कोण ?
कुडलसंगमदेवा, निरपेक्ष निर्भित जीवन, कोण जगती बा शरणावीन ?

।।१८।।
भक्तिसाठी दहा बोटाची मेहनत, गणना महाभक्त होण्यासाठी !
परी तुझे पोट नाही भरणार, भार तु होणार भूमंडळी !
त्या दोन्ही हाताने परिश्रम तू करी मिळेल भाकरी सर्वालागी !
मोळीगे मारय्या हा राजा असुनि थोर, श्रम भरपुर केले त्याने !
कुडलसंगमदेवा कायक जो करील, तयाला तारील देव माझा !

।।१९।।
चंद्रोदयामुळ समुद्राला भरती येते देवा !
तलावात पाणी आल्याने कमळ उमलते देवा !
चंद्रोदयामुळे चकोर पक्षी प्रसन्न होतो देवा !
कुडलसंगमदेवा, तुमच्या शरनांच्या आगमनाने मला अत्यानंद होतो देवा !

।।२०।।
आहेत का वेगळाले देवलोक नि मृत्युलोक ?
आहेत का या लोकी आणिक अनंत लोक ?
शिवाचारच शिवलोक शिवभक्त वसे जेथ तो ठावच देवलोक,
अंगणच वाराणसी, शरणांची कायाच कैलास कुडलसंगमदेवा, सत्य हेचि !

।।२१।।
भोजनाची थाळी, न्याहाळण्याचे दर्पण, दोन्ही एकाच धातुचे !
परि उपयोग भिन्न तयांचे ! असे दर्पण समतळ, दिसे मुख निर्मळ !
जाणता तो शरण, नेणता तो मानव!,
न विसरता सदैव पूजावे बा, आमच्या कूडलसंगमेशासी !

।।२२।।
पाहुनी पाणी मारतात डुबक्या, पाहुनी झाड घालितात फेऱ्या !
आटणाऱ्या पाण्यास, सुकणाऱ्या झाडास! भजणारे कैसे जाणतील तुम्हास कुडलसंगमदेवा ?

।।२३।।
चोराने गाय नेली म्हणू नका, तोच तुमचा धर्म !
बोंब मारू नका ! आरडाओरडा करू नका !
तेथेही जेवणारा देव, येथेही जेवणारा देव, कूडलसंगमदेव एकोभाव !

।।२४।।
शर्करेचि रेती ये, चिखल गुळाचा, झरा तो दुधाचा, खळाळता ।
फेसाळ तरंग, होय अमृताचे, वचन आद्यांचे तैश्यापरी ।
व्यर्थचि आचार, प्यावे खारे नीर, खोदुनि विहीर, वेगळाली ।
कुडलसंगमदेवा ! ऐशा गतिसम, झाली मति मम्, मायबापा ।

।।२५।।
ब्राह्मणाला देव मानल्यामुळे गौतम मुनिला गौहत्येचे पाप लागले !
ब्राह्मणाला देव मानल्यामुळे बळीराजाला बंधनात रहावे लागले !
ब्राह्मणाला देव मानल्यामुळे कर्णाला कवच कुंडले गमवावी लागली !
ब्राह्मणाला देव मानल्यामुळे दक्षाला बकरीचे शीर लावावे लागले !
ब्राह्मणाला देव मानल्यामुळे परशुरामाला समुद्रात बुडून मरावे लागले !
ब्राह्मणाला देव मानल्यामुळे नागार्जुनाचे शीर छाटले गेले !
कुडलसंगमदेवा ! शरणांनी तुम्हाला देव माणले म्हणून त्यांना कैलासप्राप्ती झाली !

।।२६।।
शरणांची झोप हेच जप जाणा, शरण जिथे जमतील तीच शिवरात्री जाणा !
शरणाचे चालणे हेच पावन- पवित्र जाणा , शरणाचे बोल हेच शिवतत्व जाणा !
कुडलसंगमाच्या शरनांचे काया हेच कैलास जाणा !

।।२७।।
नामे अनेक परी देव एकचि ! परम पतिव्रतेस, पती एकचि !
अन्य दैवतांवर भाळल्यास मन, कापनारच मग तो नाक-कान,
अनेक दैवतांचे उच्चिष्ठ जे खाती, कुडलसंगमदेवा काय म्हणू तयाप्रती ?

।।२८।।
मडक आपला आकार सोडून, पुन्हा माती होत नाही !
सोन पुन्हा लोखंड होत नाही, मोती पुन्हा पाणी होत नाही !
एकदा शरण बनल्यावर, पुन्हा भवी होत नाही पहा कुडलसंगमदेवा ।।

।।२९।।
हत्या करतो तोच चांडाळ, घाणेरडे खातो तोच अस्पृश्य
कुल कसले, त्यांचे कसले कुल ?
सकळ जीवात्म्यांचे जे इच्छीती कल्याण, ते कुडलसंगमदेवाचे शरणच कुलवान !

।।३०।।
दुर्गाम्मा पोचम्मा करून त्या मूर्ती गळ्यात बांधिती ताईत,
ते कर्ज होता मूर्ती टाकिती विकून, ठेवुनी गहाण भरती पोट,
विकला जाणारा नव्हे माझा देव, कुडलसंगमदेवासम अन्य नाही !

।।३१।।
जगविस्तार, नभोविस्तार, विस्तारातीत असे तव विस्तार !
पाताळतीत तव श्री चरण असे ! ब्रह्मांडातीत तव श्री मुकुट असे !
अगम्य - अगोचर - अप्रमित हे इष्टलिंगा,
इवलासा झालास येऊनी माझ्या हाता, हे कूडलसंगमनाथा !

।।३२।।
त्रिपुंड विभूती सकल आचाराचे कवच आहे
सकल वशीकरणाचा शुभतीलक आहे, सकल संपत्तीचे आगर आहे
अनुमात्र विभूती मस्तकी धारण केली तर अगणित भवपाष दूर होतील,
विभूती धारण करुण जगतो कुडलसंगमदेवा ।।

।।३३।।
करणे, करवून घेणे यात कोणता भेद आहे देवा ? काया आणि प्राण यांच्या संगाप्रमाणे असावे,
मी जाणत नाही असे म्हणणे योग्य ? करन्या, देण्यामध्ये कसला उपकार सांगा ?
हाताने तोंडाला जेवू घातले तर, त्या तोंडावर कसला उपकार केला सांगा कुडलसंगमदेवा ?

।।३४।।
दुध, तुप मुर्तीवर टाकुन नुकसान करण्यापेक्षा एक तर ते तुम्ही खा,
नाही तर गायी - म्हशींच्या वासरांना खायला द्या, कारण तो त्यांचा अधिकार आहे !

।।३५।।
कोराला चंद्राच्या प्रकाशाची चिंता, कमळाला सुर्याच्या उदयाची चिंता,
भ्रमराला पुष्पमधु शोषण्याची चिंता, मला आमुच्या कुडलसंगमदेवाला स्मरण्याची चिंता !

।।३६।।
वचनामध्ये नामामृत भरूनी, नयनी तुमची मुर्ती भरूनी,
कानी तुमची किर्ती भरूनी, मनामध्ये तुमची स्मृती भरूनी,
हे कुडलसंगमदेवा तुमच्या, चरण कमली मी सामावुनी !

।।३७।।
हाय हाय मानवा ! वेद, आगम, शास्त्र, पुराण, तर्क, इतिहास पठण करुनि काय ?
गाऊनि तरी काय षडक्षरी शिवाय, व्यर्थ होय
ओम नमः शिवाय षडाक्षरी मंञ जाण हेचि तंञ मजलागी, कुडलसंगमदेवा ।
तुझे नामस्मरण मंञ ,मंञ जाण साठियले ।।

।।३८।।
हातात तालावर घेऊन मी सज्ज आहे, कंबर कसून मी उभा आहे !
वार झाला तरी पाऊल मागे घेणार नाही !
पळू नका पळू नका शरण साम्राज्याचा प्रसिद्ध रक्षक आहे मी !
पळू नका पळू नका - हा भित्रेपना चांगला नाही, कुडलसंगमदेवा ।।

।।३९।।
"आम्हीच महंत आहोत, कुडलसंगम आहोत”, - असे म्हणणारे वेषधारी,
माझ्या मतानुसार - घातक आहेत, मूर्ख आहेत, शुद्र आहेत
ते महंताचे गुण, धर्म, आचरण या गोष्टीपासून दूर आहेत
अशा महंताकडे श्रेष्ठत्व, महानता काय आहे ?
अंतरंगात परंज्योतीस्वरूपी, नित्यनिरंजन, निष्कलंक, निर्देही, निरामय, निशुन्य,
स्मरण केल्या बरोबर अनंत विश्वाचा निर्माता, चरणी पातळलोक, शिरावर सत्यलोक,
उदरात चवदा लोक सामावलेली, विश्वव्याप्त परमज्योती म्हणजे महात्मा,
स्वतःसर्व समावेशक, नि;शब्ध अशांनाच - मी महंत म्हणतो, कुडलसंगमदेवा ।।
( वचन क्र. १३१९ )

।।४०।।
समता, सन्मती, सदगुण अंगीकारल्याविना;
सत्व, रज, तम, क्रोध यापासून मुक्त झाल्याविना अनुभाव कसा मिळणार ?
आत्मस्तुती, परनिंदा, असहिष्णुता,
असत्य, कुतर्क यापासून मुक्त झाल्याविना अनुभाव कसा मिळणार ?
अरिषडवर्ग, दशवायू यापासून मुक्त झाल्याविना अनुभाव कसा मिळणार ?
मद, मत्सर, वैर, वामाचार, द्वेष, दूर केल्याविना अनुभाव कसा मिळणार ?
समता, सज्जनपणा, समयाचार, यांचे मर्म दुराचारी कसे जाणणार ?
अनुभावाचे मर्म तुमचे शरणच जाणतात, अन्य कोणी नाही, कुडलसंगमदेवा ।।
( वचण क्रं. १३९२ )

।।४१।।
बोलते करता येई सर्पदंश होता, बोलते करता येई भूतबाधा होता,
धनपिशाच्चबाधा झाली जयासी, बोलते न करता येई तयासी ।।
दारिद्र्यरुपी मांत्रिक आल्यावरी कुडलसंगमा,बोलतसे झडकरी ।।

।।४२।।
सुख येता पुण्याचे फळ म्हणणार नाही, दु;ख येता पापाचे फळ म्हणणार नाही ।।
तुम्ही सर्व केले असेही म्हणणार नाही, कर्माचा कर्ता तू आहे असे म्हणणार नाही ।।
उदासीनतेला शरण जाणार नाही, कुडलसंगमा, तुमचा उपदेश विसरणार नाही ।।
समर्पण हेच जीवन आहे” (मानव सेवा हे जीवन आहे) ।।
( व.क्र. ६९५ )

।।४३।।
दगडाच्या नागाला दुधाचा अभिषेक करा म्हणतात
जीवत नाग दिसताक्षणी मारून टाका म्हणतात
भुकेला व्यक्ति आल्यास पुढे जा म्हणतात
जेवनार्या लिंगाला नैवेद्द दाखवा म्हणतात
शरणाची उपेक्षा केल्यास दगडाखाली दबलेल्या ढेकळासारखी स्थिति होइल ।।

।।४४।।
सदा दुसर्याच्या घरची राखन करणारे काही देव आहेत, जा म्हटले तरीही जात नाहित
काही देव कुत्र्यापेक्ष्या कष्टदायक आहेत, दुसर्याकड़े मागणारे हे देव स्वत: काय देणार ?

                                   ।।४५।।
नवस करणे म्हणजे दंड भरल्यासारखे आहे
गर्दी जमा करून केलेली भक्ति अवडंबर (दिखावा) आहे
नवस करू नका, अवडंबर करू नका, आलेल्या शरणांचा आदर करा ।।

।।४६।।
नदीत स्नान करणार्या बंधुनो, नदीत स्नान करणार्या स्वामिनो,
त्याग करा ! त्याग करा ! परस्त्रीचात्याग करा ! परधनाचा त्याग करा !
हे त्यागल्याविना नदित स्नान केले तर नदीच आटून जाईल ।।

।।४७।।
झाडाचे फुल काढून, झाडाला अर्पण करने, नदीचे पाणी नदीला अर्पण करणे !
वासराला दूर करून गाईला त्रास देऊन दूध काढून खाऊ नका !
ही माया अनेकांना फसवित आलेली आहे !

।।४८।।
लिंग गळ्यात बांधले, स्पर्श केला विभूति लावली,
परंतु मन शुद्ध नसेल तर काय उपयोग ?
भाव शुद्ध असला पाहिजे !

।।४९।।
वेषधारी, ढोंगी, थोर लोकांची भक्ति म्हणजे
चुनखड़ी कमरेला बांधून पाण्यात बुडन्यासारखे आहे !
त्याचा ढोंगीपणा त्यालाच जाळणार !

।।५०।।
आज उद्या म्हणून चालढकल करू नका !
आजचा क्षण शिवशरणासाठी पवित्र आहे !
आजचा क्षण हरशरणासाठी पवित्र आहे !
वर्तमान क्षणच सर्वाधीना पवित्र आहे !

।।५१।।
ग्निला देव म्हणून त्यामध्ये आहुति देणार्या ब्राम्हणाच्या घराला आग लागली असता
अग्निवर मोरिचे पाणी टाकतात, रस्त्याची धूळ टाकतात, आरडाओरडा करतात !
अग्नीची स्तुति करायची सोडून निंदा करतात, पहा कुडलसंगमदेवा !

।।५२।।
पोपटाने भविष्य सांगुन काय उपयोग ?
मांजर कधी येउन खाइल त्यालाच माहिती नाही !
सर्व सृष्टि पाहणारे डोळे स्वतःला पाहू शकत नाहित !
दुसर्याचे भविष्य जाणल्याचे ढोंग करणारे स्वताचेच भविष्य जानू शकत नाही,कुडलसंगमदेवा !

।।५३।।
वारुळाला मारले तर साप मरेल काय ?
अघोर तप करून काही उपयोग होइल काय ?
मन शुद्ध नसनार्यांना कुडलसंगमदेव प्रसन्न होइल का ?

।।५४।।
महार मांग भक्त असतील तर, त्यांच्या घरच्या कुत्र्याचा पंचमहावाद्यान्नी सन्मान करतो !
उधे चांगभला म्हणून जयघोष करतो !
कुलश्रेष्ठ ब्राम्हणाचा कदापि सन्मान करणार नाही !

।।५५।।
गरीब ब्राम्हण,कितीही मोठा भक्त झाला तरी,
जानव्याचा मोह सोडत नाही !

।।५६।।
जो ब्राम्हण स्वतःचे शिर निर्माण करू शकला नाही,
तो सृष्टि निर्माता कसा होउ शकतो ?
ज्या विष्णुने आपल्या पुत्राचे रक्षण केले नाही,
तो सृष्टिचा पालनकर्ता कसा होऊ शकतो ?

।।५७।।
महार वस्ती आणि शिवालयाची जमीन एकच आहे !
शौचाचे आणि आचमनाचे पाणी एकच आहे !
स्वतःला जाणनार्याचे कुळ एकच आहे !
षडदर्शनाने मिळनार्या मुक्तीचे फळ एकच आहे !
ज्या प्रमाने तुम्हाला जाणनार्याचे व्यक्तित्व एकच आहे, कुडलसंगमदेवा !

।।५८।।
मी दोषाला दोषच म्हणतो,
गुणाला गुण म्हणतो,
या गोष्टीसाठी मरेपर्यंत लढ़तो !

।।५९।।
डोके घाण झाले तर न्हाऊन स्वच्छ होते !
कपडे घाण झाले तर धुवून स्वच्छ होतात !
मनाची घान धुण्यासाठी मात्र कुडलसंगमाच्या शरणांचा सत्संग अनुभावच पाहिजे !

।।६०।।
आचार जानुन घ्या, विचार समजुन घ्या,
पहा जंगम हाच लिंग आहे !
जातीभेद नाही, सुतक नाही, अजाताला कुल नाही !
बोलल्याप्रमाणे आचरण नसले तर समाधानी होणार नाही, कुडलसंगमदेव !

।।६१।।
चोवीस तिथीहुन श्रेष्ठ, ग्रहण संक्रातीहुन श्रेष्ठ,
एकादशी, व्यपिताहुनी श्रेष्ठ,
सुक्ष्म शिवपथ जाणणारे आहेत !
होम, नेम, जप, तप करणार्याहुन श्रेष्ठ,
तुझे स्मरण करणारे शरण हे कुडलसंगमा !

।।६२।।
अश्वमेधयज्ञ असो, गायत्री मंत्र असो, जन मोहन यंत्र असो
कुडलसंगाच्या शरणांची वाणी याहुणी श्रेष्ठ पहा !

।।६३।।
नाही पुनर्जन्म,  मागल्या जन्मीचे अरे काही नाही,
आपल्याच हाती इथल्या जन्मीचे, इथेच भोगावे पुन्यफळ तत्काळ,
आपुल्याच हाती कुडलसंगमदेवा !

।।६४।।
विस्तवासी देव मानुनी हवी वाहणार्या ब्राम्हणाचे घर आग लागुनी जळता,
मोरीचे पाणी अन धुळ टाकुणी, हाक मारीती आरडा ओरडा करूनी,
कुडलसंगमदेवा, वंदन करने विसरूनी, करीती निंदा अग्नीची सारे !

।।६५।।
शिव शिव दगडाला देव म्हणत असाल तर काय उपयोग ?
मातीला देव म्हणत असाल तर काय उपयोग ?
ज्ञान घेऊन अज्ञान दिसत असेल तर काय उपयोग ?
लिंगायत म्हणुन घेऊन लिंगायत तत्व माहीत नसेल तर काय उपयोग ?
इष्टलिंग धारण करुनही इतर देवांना पुजत असेल तर व्याभिचारी तो तत्वांचा,
कुडलसंगमदेवा !

।।६६।।
वेदांवर तलवार चालवेन । शास्त्रांना साखळ दंडांनी बांधेन ।।
तर्कांच्या पाठीवर चाबुक ओढेण । आगमांचे नाक कापीन ।।
पहा हे महादानी कुडलसंगम देवा मातंग चन्नय्याचा पुत्र आहे मी ।।

।।६७।।
लोखंड तापवुनी झाला लोहार, धुनी धुउनी झाला परीट,
वस्त्र विणुनी झाला विनकर, वेद वाचुनी झाला ब्राम्हण,
या जगी कानातुन जन्मला का कोण ?  कुडलसंगमेशा !
या योगाने लिंगस्थळ जो जाणी तोच कुलवान !

।।६८।।
हत्ती त्या वाटेने गेला म्हणून, शेळीही त्या वाटेने गेली म्हणावे का ?
कुडलसंगमाच्या शरणाशी बरोबरी करण्याच्या गोष्ठी मी करु शकेन का ?
जंगमदासोह करणाऱ्या भक्तांशी मी समान का ?
सांगा हो कुडलसंगमदेवा !

।।६९।।
असो न जाणे कोणाच्या मनी काय ?
चांगले म्हणू न शके, वाईटहि म्हणू न शके,
शिवभक्त असल्याकारणाने, म्हणून जंगमच लिंग, कुडलसंगमदेवा !

।।७०।।
आयुष्य संपल्याविना मरण नसे,
वचनानुसार वागले तर क्षुद्रत्व नसे.
का बरे मी घाबरु लोकांच्या भिवविण्यास ?
का बरे घाबरु, कुडलसंगमदेवा तुमचा दास असताना ?

।।७१।।
भट्टीमधील खापरीसम, अमृतमंथनातील सर्पासम,
असे मी बाहेरुण तुकतुकित
सिंहास मोहित मदगासम, मी जंगम मोहित असे, कुदलसंगमदेवा !

।।७२।।
रात्र काय आंधळ्यास, दिवस काय आंधळ्यास !
टाळ कुटला काय आणि पंचमहावाद्य वाजवली तरी काय बाहिऱ्यापुढे !
कुडलसंगमदेवाचा पथ न जानणाऱ्यास कांही सांगितले तरी व्यर्थच !

।।७३।।
डाव्या हाती तलवार, उजव्या हाती मांस, तोंडी असे सुरापत्र,
तरीही गळ्यात लिंग असता, त्यासी म्हणे मी लिंग, त्यासी म्हणे मी संग,
कुदलसंगमदेवा त्यासी म्हणे मी जंगम !

।।७४।।
बैलासम चाकर होऊन, सेवक होऊन मी राहीन;
तुमच्या शरणांच्या घरचा,
कुदलसंगमदेवा,लिंगमजंगमाचा दास होऊन राहीन !

।।७५।।
माझ्या शरीराचा दांडा करा हो, माझ्या शरीराचा भोपळा करा हो,
माझ्या नाडीची तार करा हो, माझ्या बोटांची काडी करा हो,
बत्तीस राग गा हो, उराशी कवटाळुनी वाजवा हो, कुडलसंगमदेवा !

।।७६।।
मजहून नसे कोणी लहान, शिवभक्ताहुन नसे कोणी महान !
तुमच्या चरणांची साक्ष, माझ्या मनाची साक्ष,
कुदलसंगमदेवा, मज हेचि प्रमाण !

।।७७।।
काय पाहिजे ते साधता येईल,
आणखी काहीतरी साधता येईल हो !
आपण कोण हे जाणने शक्य नाही,
कुडलसंगमदेवाची कृपा झाल्याशिवाय.

।।७८।।
चुलितील राख विकत घ्यावी लागत नाही, मनसोक्त फासुन घ्या.
फासुन काय उपयोग, मनी सदभाव नसल्यास ?
एका शब्दास सतराशे गोष्ठी करणाऱ्या दांभिकास कसा प्रसन्न होईल आमुचा कुडलसंगमदेव ?

।।७९।।
भेटणाऱ्या भक्तास् हात जोडणारा खरा भक्त,
मृदु बोलनेच खरा जप पहा हो, मृदु बोलनेच खरा तप पहा हो,
सद्विनयच शिवास प्रिय हो,
कुडलसंगमदेव, असे नसलेल्यावरी कृपा न करी हो !

।।८०।।
आरशात स्वतःस पाहणाऱ्या बंधुंनो ! जंगमाकडे पहा हो !
जंगमामध्येच लिंग समाविष्ट असे हो !
कुलसंगाचे वचन सांगे, 'लिंग,जंगम' एकच असती !

।।८१।।
मातीची भिंत कितीही धुतली तरी चिखल जाईल का ?
मम शरीरातील दुर्गुण नाहीसे करुण कृपा करा हो.
कांबळ्यामध्ये कणिक तिंबल्यागत, पहा हो माझे मनकुडलसंगमदेवा,
तुम्हास ''शरणु'' म्हणून शुद्ध होई पहा हो मी !

।।८२।।
पती इष्टलिंग आराधक भक्त तर, पत्नी क्षुद्र देवतांची आराधना करणारी !
पती स्वीकारी पादोदक, प्रसाद तर पत्नी सेवन करी मद्यमांस,
पात्र व पदार्थ शुद्ध नसलेल्यांची भक्ति ताडीचे मडके बाहेरुण धुतल्यागत हो कुलसंगमदेवा !

।।८३।।
पगारी सैनिक नसे मी, बलिदान देणारा सेवक असे हो मी !
हरुन पळून जाणारा चाकर नसे हो मी.
ऐका, कुडलसंगमदेवा, मज मरणच महानवमी हो !

।।८४।।
तुपाच्या चवीस्तव तलवारीचे पाते चाटणाऱ्या कुत्र्यासम माझे जिणे !
संसाराचा मोह न सोडी माझे मन, ही कुत्र्याची सवय सोडवा !
कुडलसंगमदेवा, हा तुमचा धर्म !

।।८५।।
करीन मी शेती गुरुपुजेसाठी, करीन व्यापार देवा लिंगपुजेसाठी !
परसेवा करीन मी जंगम दासोहासाठी !
कर्मे जी मी करीन कुडलसंगमदेवा, फळ त्याचे देशील तूच हे मी जाणतो !

।।८६।।
एक निंदक आणि एक स्तुतीपाठक, दोघेही परमबंधु आमच्या शिवयोग्याचे !
एकाने घेतले पाप, एकाने घेतले पूण्य, कुडलसंगमदेवा, तुमचे शरण नित्यमुक्त !

।।८७।।
करुनी लिंगपूजा निष्ठेने, अन्य पथ न जाणती शरण !
भुजंगाच्या फण्यावरील माणकापरी सुशोभित !
दर्पणीच्या प्रतिबिंबासम अभिन्न होऊन राहती तुमचे शरण, कुडलसंगमदेवा !

।।८८।।
पाण्याचा बुडबुडा रक्षिण्या केली लोहाची चौकट, त्यासाठी खटाटोप पहा !
जगावे पुजीत महादानी कुडलसंगमदेवास; देहाचा भरवसा नाही बा कोणास !

।।८९।।
छप्पन वाचले काय आणि छप्पन्न ऐकले काय ?
आशा सुटत नाही, रोष जात नाही, मज्जन घालून फल काय ?
वागण्या बोलण्यात मेळ नसलेल्या ढोंगीस पाहून हसतो आमचा कुडलसंगमदेव !

।।९०।।
राजा येवून महारवाड्यात राहिला तर त्याला महारवाडा म्हणता येईल का ?
लिंगधारींचे घर कैलासच असा विश्वास ठेवला पाहिजे !
चांडालवाटिकायाम स्थितो यदि शिवभक्त: ।।
ततश्रेणी शिवलोकस्य ततगृहम शिवमंदिरम ।।
असे म्हंटल्याने,जगातील दांभिकांचे बोलणे नकोच,
जिथे कुडलसंगमदेव तिथेच कैलास आहे !

।।९१।।
देवलोक मृत्यूलोक नसे अन्यठायी,
सत्यवचनी साठले देवलोक ! मिथ्य वदने हाचि मृत्युलोक !
आचाराठायी स्वर्ग ! अनाचारचि नरक ! कुडलसंगमदेवा यास तुम्हीच बा साक्ष !

।।९२।।
शरण उठून बसला असता शिवरात्र समजावे !
शरण झोपी गेला असता जप ध्यान समजावे !
कुडलसंगमाच्या शरणांचे कायकच कैलास समजावे !

।।९३।।
हृदयात कातरी, जिभेवर गुळ !
नाचले तरी काय आणि गायिले तरी काय ?
नित्य नित्य शिवरात्री केली तरी काय ?
मी माझ्यासारखा,मन मनासारखे,
कुडलसंगमदेवा ! तुम्ही तुमच्यासारखे !

।।९४।।
 इष्टलिंगधारी भक्त घरी आल्यास, कायक कोणता म्हणून मी विचारले तर,
तुमची शपथ ! तुमच्या पुरातनांची शपथ !
शिरच्छेद करा कुडलसंगमदेवा !
भक्तामध्ये कुळ शोधल्यास, तुमच्या अंतपुरातील सतीची शपथ. !

।।९५।।
कोणीही असोत जातीने कनिष्ठ, लिंगस्पर्शाने नष्ट होती कुळ ।
परीस स्पर्शाने, लोखंड होई सोनें । येतो लिंगदीक्षेने, शिवकुळी ।।

।।९६।।
गोत्र विचारता गप्प का बसता ? मान झुकवून भूमी का गिरविता ?
गोत्रनाम मादार चेन्नय्या, डोहर कक्कय्या असे का सांगत नाहीत, कुडलसंगमदेवा ?

।।९७।।
मन माझे न पळो सैरावैरा, शपथ मला शिवशंकरा !
परस्त्री वाटो मला महादेवी, हे महादानी कुडलसंगमदेवा !

।।९८।।
लाख भरलेल्या,वितळनार्या मुर्तिन्ना देव कसे मानावे ?
वेळप्रसंगी विकल्या जाणार्या मुर्तिन्ना देव कसे मानावे ?
भीती वाटते म्हणून पुरल्या जाणार्या मुर्तिन्ना देव कसे मानावे ?

।।९९।।
शिवशरण एकत्र येणे शुभ लग्न समजावे !
हाच उत्तम मुहूर्त आहे, हाच शुभ मुहूर्त आहे !
हेच चंद्रबल आणि ताराबल आहे  !
उद्यापेक्ष्या आजचा दिवस चांगला आहे, कुडलसंगमदेवा !

।।१००।।
प्राणीवध करणार्या वेदांना मी श्रेष्ट मानणार नाही !
कर्मउपासना करणार्या शास्त्रांना मी श्रेष्ट मानणार नाही !
निरर्थक शोध घेणार्या श्रुतिंना मी श्रेष्ट मानणार नाही !

।।१०१।।
आदिपुराण असुरांना मारक आहे ! वेदपुराण बकऱ्यांना मारक आहे !
रामपुराण राक्षसांना मारक आहे ! भारतपुराण गोत्रांना मारक आहे !
सर्व पुराणे कर्माधीन आहेत ! आपल्या शरणांच्या वचनासम कोणी नाही, कुडलसंगमदेवा !

।।१०२।।
मणिमाळा घालून, अनेक ठिकाणी भस्म लावून !
तापत्रयाविना पूजा करा, तापत्रय लिंगाला पसंत नाही !
केवळ अभिषेक केल्याने कुडलसंगमदेव प्रसन्न होइल का ?

।।१०३।।
कोट्यनुकोटि जप करण्याचे व्यर्थ परिश्रम का करीत आहात ?
एक लहानसे गीत अनंतकोटि जपासमान आहे !
शरनांना पाहून हसत खेळत गावे !

।।१०४।।
पाहून पाहून केले जाणारे व्रत योग्य नाही !
मनाच्या आणि देहाच्या तृप्तिसाठी केले जाणारे व्रत योग्य नाही !
ज्ञानाची उपेक्ष्या करून काल्पनिक व्रत करणे योग्य नाही !

।।१०५।।
वेद पाठ केले तरी काय ? शास्त्र पाठ केले तरी काय ?
जप केला तरी काय ? तप केला तरी काय ?
आमच्या कुडलसंगय्याला जानल्याशिवाय हे सर्व व्यर्थ आहे !

।।१०६।।
पाप पुण्य सारे आपल्याच हातामध्ये आहे !
'अहो' म्हटले तर स्वर्ग आहे ! 'अरे' म्हटले तर नरक आहे !

।।१०७।।
ज्यांच्या आचार विचारात एकता नाही, ते शिवचारासाठी योग्य नाहित !
सात्विकालाच शिव प्रसन्न होतात, जेथे शिवाचार नाही तेथे शिव नाही !

।।१०८।।
हत्ती घाबरे अंकुशास हो, पर्वत घाबरे वज्रायुधिस हो !
अंधार घाबरे ज्योतीस हो, अरण्ये घाबरे दावाग्नीस हो !
पंचमहापातके घाबरती, कुडलसंगांच्या नामस्मरणास हो !

।।१०९।।
आपल्यापाशी शौर्य असल्यास, सुई असो तलवार असो,लढलेच पाहीजे !
शरणपथ अनुसरल्यास शिवभक्ताच्या घरचे ताकपण, पंचामृत करुन घेतले पाहीजे !
भ्रमित होऊन लिंगास नैवेद्य शोधणारे, पापी लोक कुडलसंगमदेवास नावडती !

।।११०।।
पळून जाणारा योद्धा नव्हे, मागणारा भक्त नव्हे !
पळून जाऊ नये योद्ध्याने, मागू नये भक्ताने !
मी पळणार नाही, मी मागणार नाही हो कुडलसंगमदेवा !

।।१११।।
तवा काय जाणे पोह्याची चव  ? माकड काय जाणे झुलत्या मंचाचे सुख ?
कावळा नंदनवनी राही तरी होई का कोकीळा ?
सरोवरा काठी राहिला बगळा तरी राजहंस होई का,  कुडलसंगमदेवा ?

।।११२।।
आयुष्य संपल्याविना मरण नसे, वचनानुसार वागले तर क्षुद्रत्व नसे !
का बरे घाबरु लोकांच्या भीती घालण्यास ?
का बरे घाबरु, कुडलसंगमदेवा ! तुमचा दास असून ?

।।११३।।
कोणत्याही जातीचा असो,
शिवास स्मरणार्याच्या तोंडचे तांबूल खाईन त्याची पारशी वस्त्रे घालीन,
त्याची पादञाने राखून जीवन जगेन, कुडलसंगमदेवा !

।।११४।।
माझ्या चुका अनंत कोटी, तव सहनशिलतेस सीमा नसे !
यापुढे चुका केल्यास तुमचे चरण प्रमाण, कुडलसंगमदेवा !
तुमच्या प्रमथा समोर किन्नरी बोम्मय्याची साक्ष !

।।११५।।
माझे हित-अहित तुमचेच हो, माझी लाभ-हानी तुमचीच हो !
माझा मान-अपमान तुमचाच हो, वेलीस फळाचे ओझे वाटेल का, कुडलसंगमदेवा ?

।।११६।।
दासीपुत्र असो, वा वेश्यापुत्र असो, लिंगदीक्षा झाल्यावर,
साक्षात शिव मानून, वंदुन, पुजुन, तयांचे पादोदक, प्रसाद स्वीकारनेच योग्य !
असे न करता, तिरस्कार करनार्यास पंचमहापातक नरक पहा हो, कुडलसंगमदेवा !

।।११७।।
शत्रुच्या ललकारीने तलवार उचलतो, युद्धाला तयार होतो !
गुरुचे नाव घेऊन तलवारीचा घाव घालतो !
हरलो तर आपले नाव सांगणार नाही !
मला तुम्ही पारखून घ्यावे, कूडलसंगमदेवा !

Sunday, July 26, 2015

वचनवाङमय

      वचन म्हणजे प्रतिज्ञा वचन म्हणजे आत्मसाक्षीने केलेले निवेदन बोले तैसा चाले ’ तैसा बोले म्हणजे वचन लोकांनी, लोकांच्या कल्याणासाठी लोकांमध्ये राहून लोकांच्या बोलीभाषेतून निर्माण केलेली लोकसंहिता म्हणजेच वचन सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास वचन म्हणजे बोलणे अर्थात हे बोलणे प्रतिज्ञापूर्वक असून बसववादी शरणांचे हेच बोलणे एक शास्त्र म्हणून मान्यता पावले. म्हणून बसववादी शरण हे वचनसाहित्याचे निर्माते होत. शरणांच्या लहान-लहान बोलण्यातून प्रारंभ झालेल्या वचनांनी आज एक धर्मसंहिता किंबहुना लिंगायत धर्मग्रंथ म्हणून मान्यता पावले आहे.
       बाराव्या शतकात धर्मशास्त्र कठीण अशा संस्कृत भाषेत बंदिस्त होणे,संस्कृत ही देवनागरी लिपी शिकणे सर्व सामान्यांचा अधिकार नव्हता. संस्कृत भाषेत ज्ञानाची संपदा बंदिस्त झाल्याने फार मोठा समाज ज्ञानापासून वंचित होता. अशा प्रसंगी म. बसवण्णांनी सर्वसामान्यांना समजेल- उमजेल अशा बोली भाषेतून अर्थात कन्नड भाषेतून धर्मसूत्रे अतिशय सोपी आणि सुलभ करून वचनाच्या माध्यमातून सांगितली. बसवण्णांनी बचनाआधारे लोकांना धर्मशास्त्राचा फक्त परिचय करून दिला असे नाही तर भाषे- भाषेतील अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. संस्कृत हीच फक्त देवभाषा आणि इतर भाषा द्रविडभाषा किंवा दानवभाषा हा भेद नष्ट केला. वचनावाङमयातून जनसामान्य लोकांची जागृती उध्दार आणि मार्गदर्शन हाच मुख्य उद्देश असल्याचें दिसून येते. अनाकलनीय अशा सौंदर्यप्रचुर -पांडित्यपूर्ण शब्दांचा वापर न करता किंवा राजे- महाराजे, धनवान गणमान्य व्यक्तींची अतिशयोक्तीपूर्ण वर्णन करणारे स्वार्थी काव्यरचना त्यांनी केली नाही. तर प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आत्म्याची जाणीव करून देणे त्या आत्मज्ञानाच्या प्रकाशात आपले जीवन सार्थकी बनविण्यासाठी केलेला प्रामाणिक प्रयाण म्हणजे वचनवाङमय होय.
       या वचनाचं स्वरून ती अनुप्रास किंवा वृत्ताच्या नियमांनी घट्ट बांधली गेली नाहीत किंवा गद्या प्रमाणेत अति सैल होऊन वाहत गेली नाहीत. तर यात पद्याची लय, नाद आणि गद्याची सरलता आहे. म्हणून ही एकप्रकारची गद्दगीते आहेत. बसवण्णांची वचने याचे एक उत्कृष्ठ उदा. बनले आहे. मुळात बसवण्णा हेच खरे वचन रचनाकार आणि मूळ निर्माते आहेत. ही वचनेहृदयातील भावनेच्या सुगंधाने ओथंबलेली आणि अतिसहज कोणत्याही भाषेतून सुगम गायन बनली आहेत. यात पांडित्यप्रचूर शब्दांचा गोंधळ नाही. दार्शनिक हृदय इथे कवीहृदय बनले आहे. कवी हृदयाने फक्त शब्दसौंदर्य, अर्थसौंदर्य, नवरसपान करणारे काव्य बनविले आहे. तर दार्शनिक हृदयाने त्याच्याही पुढे एक पाऊल टाकत अर्थ- शब्द सौंदर्याच्या रसास्वादाला दैवी भावनेचे सिंचन प्राप्त झाले आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या वचनात लय-अनुप्रास आपोआपच निर्माण झाला आहे. ही वचनसंपदा केवळ एक साहित्यकृतीच नाही तर ती तात्वीक बनली आहेत.
       वचन साहित्याचा उगम का? आणि सिा झाला? हे पहिले मोठे उध्बोधक आहे आशिया खंडात सर्वप्रथम सामाजिक, धार्मिक आणि साहित्यीक क्रांती घडून आली ती १२ व्या शतकात कर्नाटकामध्ये. ही बाब भारताच्या इतिहासात सुवर्णक्षरांनी नमुद करण्यासारखी आहे. तेव्हाची परिस्थिती पाहता बौध्द धर्माला भारताबाहेर घालविण्यात आणि जैन धर्माला शिथिल करण्यात वैदिक धर्म आणि त्यातील कर्मकांड यशस्वी ठरली. वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था पुन्हा भक्कम झाली. अनेक देवोपासना आणि पुरांहितशाहीने आपली पाळेमुळे पुन्हा एकदा समाजात घट्ट रूजवली. अज्ञान, अंधश्रध्दा यांच्या जोडीने दारिद्रय आणि रोगराई गुण्यागोविंदाने नांदू लागली. धर्म, ज्ञान, भाषा (संस्कृती) ही एकाच वर्गाची मक्तेदारी झाली चया सर्वांचा धिक्कार करीत १२ व्या शतकात म.बसवण्णांनी क्रांती घडविली. या क्रांतीचे प्रभावी अस्त्र किंवा हत्यार म्हणजे वचनसाहित्य/ वचनवाङमय होय. या वचनसाहित्याच्या तलवारीला धार दिली ती अनुभवमंटपाच्या ज्ञानपीठातील अनुभवाने. ही क्रांतीची तलवार कन्नड भाषेच्या म्यानात विराजमान झाली. म.बसवण्णाच्या या ‘ वचनरूपी’ परिस्पर्शाने अनेक शरणांच्या विचरांची ज्ञानज्योत प्रज्वलीत केली. अनेक शरणांनी कंठ फुटला. त्या वचन रचनाकार बनल्या. खरच ‘ न भूतो न भविष्यति.’ भारताच्या काना- कोप-यातून आलेल्या शरणांच्या वचनज्योतीने अनुभवमंटप उजळून निघाला संबंण मानवजातीच्या मनात आत्मसाक्षात्काराचा हुंकार घडविणा-या वचनसाहित्याने भारतभुमी उजळून निघाली. मानवजातीच्या कल्याणाच्या दिशेने धर्माची पावले वळू लागली. म. बसवण्णाचे स्थान अनेक कारणांनी अनन्यसाधारण ठरले आहे.त्यांनी स्थापन केलेल्या अनुभवमंटपरूपी ज्ञानर्पणात सर्व जाती, वर्ग,वर्ण, लिंग असा भेदभाव न करता शरण-शरणी एकत्र आल्याचा उल्लेख आयदक्की लक्कम्माच्या वचनातून स्पष्ट होतो. ‘यांच्या शरणांचे सातशे सत्तर अमरगणांचा प्रसाद घेऊनी जगते आहे’ या वचनातून हे सर्व शरण-शरणी एकत्र बसून आपल्या आत्मज्ञानाबारोबरच अनुभावावर चर्चा करीत. अनुभवमंटपात होणारी ही चर्चा अथवा अभिप्राय शांतरस ( शरण) आणि त्यांच्या हाताखालील कर्णिक ( कारकून) लिहून घेत. त्यावन शून्य पीठाधिकारी अल्लमप्रभूदेव वचनातील त्रूटीदूर करून त्यावर मान्यतेचा मोहोर उमटवीत.त्या वचनाच्या अनेक प्रती तयार करून चरजंगमाला देण्यात येत असे. हे चरजंगम एका गावात एक दिवस व शहरात पाच दिवस मुक्काम करून ती वचने सुगम गायनातून समाजापर्यंत पोहचविण्याचे कार्य करीत. वचन साहित्यांतून प्रबोधनाची जनजागरणाची एक मोठी चळवळ त्याकाळात उभी राहिली होती. ती सामाजिक, धार्मिक, आर्थिक पुनरूज्जीवनाची मोठी क्रांतीच होती. ही वचने ताडपत्रांवर लिपीकार मुद्रित करून ठेवत. हा त्या काळातला एक नवा आविष्कार होता. कारण त्याकाळी शिलालेख, ताम्रपट, मातीच्या विटा यावर अक्षरे कोरली जात पण ताडपत्रावर इतक्या मोठ्या प्रमाणात रचना कोरण्याची प्रक्रिया खरच कौतुकास्पद अशीच होती. याचे सारे श्रेय म.बसवण्णा आणि शरण-शरणींना जाते.

- प्रा. डॉ. प्रभा वाडकर ( लिंगायत सेवा संघ कोअर कमेटी मेम्बर )
साभार - दैनिक एकमत  

Saturday, June 13, 2015

लिंगायतांची अष्टावरण संकल्पना

१) गुरु - अरिवे गुरु म्हणजेच ज्ञान हाच गुरु ही सोप्पी गुरुची व्याख्या बसवन्ना नि आपल्याला सांगितलीये .

२) लिंग - लिंगायतान्नी ईश्वर नाकारलाही नाही आणि इतरांनी तो ज्या प्रकारे स्वीकारला त्या पद्धतीने स्विकारलाही नाही . लिंग अर्थात ईष्टलिंग  , ईष्टलिंग म्हणजे आपणा स्वतःला अभिप्रेत असणारा देव , आणि तो सदैव आपल्या सोबत असल्याची जाणिव राहावी यासाठी त्याला आकार देवून महामानव बसवन्ना नि तो आपल्या तळहातावर दिला .

३) जंगम - जन+गम , लोकांमधे जाऊन धर्माचा प्रसार प्रचार करणारा कोणीही व्यक्ति म्हणजे जंगम . काळओघाने आज जाती निर्माण झाल्यात त्यात जंगम ही पण एक जात झालिये पण धर्म ज्या सिद्धान्तावर उभा राहिला तोच प्रचारक म्हणुनच जंगम शब्दाचा उल्लेख योग्य आहे .

४) रुद्राक्ष - आठ बाह्य आवरनांन पैकी एक , आणि आपण शिवाचे वंशज आहोत याची साक्ष देणारे एक महत्त्वपूर्ण आवरण म्हणजे रुद्राक्ष .

५) भस्म - CaCO3, कैल्शियम कार्बोनेट , जे अंगाला लावताच एनर्जी निर्माण करते , आणि आपणाला निर्णायक बनवते , हा झाला वैज्ञानिक मुद्दा पण शरण बांधवांना एकमेकांची ओळख व्हावी त्यांत आपसी संबंध वाढावेत हा त्या मागचा उद्देश . आणि हे तीन पट्टे अनुक्रमे भुत, भविष्य आणि वर्तमानाची साक्ष ठेवून सत्याने व निष्ठेने काम करण्याची प्रतिके आहेत ....

६) पादोदक - स्वतःच्या ज्ञानाने सुर्यावत तेजस्वी होने म्हणजे पादोदक , म्हणजे ज्ञानामृताचे प्राशन म्हणजे पादोदक पण आपले दुर्दैव की याचा खरा अर्थ सांगण्याचे काम ज्यांचे होते त्यांनीच त्यांचे पाय धुवून पाणी पाजन्याचा प्रकार सुरु करून धर्माशी प्रतारणा केलि .

७) प्रसाद - कोणालाही न लुबाडता न फसविता , कायक करून कमावलेल्या पैशातुन केलेला उदरनिर्वाह म्हणजेच प्रसाद .

८) मंत्र - " ॐ नमः शिवाय " जगातील पहिल्या संस्कृतीचा जनक आणि आपल्या सर्वांचा पूर्वज शिव यांचे स्मरण आपल्याला सदैव राहावे करीता हा मंत्र अष्टावरणात समाविष्ट करण्यात आला .

      मी मला समजल त्या प्रमाणे अष्टावरण संकल्पना प्रामाणिक पणे येथे मांडलिय , अनेक वचनातुन मला जेवढा अर्थबोध झालाय तेवढा मी संक्षिप्तरुपात व्यक्त केलाय . तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही पण शेयर कराल हीच एक अपेक्षा ठेवतो .

शरनु शरणार्थी .....!

- अविनाश यशके (8149760150)

लिंगायतांचि षटस्थळ संकल्पना

      लिंगायत धर्मात सहा स्थळे आहे (six stages) ज्याला आपण षटस्थळ म्हणतोत. ह्या six stages आपण प्रत्येकाने achive करण्याचा प्रयत्न करायचा असतो, म्हणजे जेणेकरून एक परिपूर्ण लिंगायत बनता येईल.!  ही षटस्थळे achive करण्यासाठी अष्टावरण आहेत ज्यांचा उपयोग ज्ञान संपादन करने आणि मनावर ताबा मिळवन्यास होतो.! आणि पाच आचार आहेत ज्यांना आपण पंचाचार म्हणतोत जे क़ी धर्माचरणात येणारे अडथळे दूर करण्यासाठी उपयोगी पडतात.! 

आता ही सहा स्थळे कोणती ते पाहुत :-

१) भक्त :-
      आता भक्तस्थळ हे पहिल स्थळ, नेमके भक्त कुणाला म्हणावे हा पहिला प्रश्न आणि याच उत्तर मिळवण्यासाठी मी संदर्भ घेतो संत शिरोमणि मन्मथ माऊली यांचा, मन्मथ माऊली षटस्थळाच विवेचन करणाऱ्या आपल्या एका अभंगात म्हणतात,-
"शिवाविन अन्य दूजा नाही देव ।
भक्तस्थळी भाव हेची शुद्ध ।।"
      शिव हा एकमात्र देव मानून त्याची भक्ति करणारा म्हणजे भक्त. लिंगायत बनन्याची पहिली पायरी म्हणजे हे भक्तस्थळ.

२) माहेश्वर :-
      चराचरी सर्वत्र शिव, प्रत्येक मानसात शिवाचा अंश शोधणारा शिवभक्त म्हणजे माहेश्वर. ह्या स्थळात पोहोचल्यावर भक्त हा चिकित्सक वृत्तिचा होतो. धर्माविषयी उत्सुकतेने अभ्यास करणारा हा माहेश्वर.

३) प्रसादी :-
      या स्थळात थोड़ी वैश्विक भावना माहेश्वरात जागृत होते, चिकित्सका बरोबरच जिज्ञासा प्रकट होते, लिंगार्पित सर्व प्रसाद म्हणून हा सेवन करतो. हा प्रासादिक गुण पहिली दोन स्थळे प्राप्त केल्यानंतर आपसुकच जागृत होतो. मनावर आणि वाचेवर ताबा येतो. हे तीसर स्थळ, लिंगायत बनण्याची तीसरी पायरी.

४) प्राणलिंगी :-
      स्वतःमधे शिवाला शोधनारा म्हणजे प्राणलिंगी. जो इतरांच्या उपयोगी जावे यासाठी धड़पड़त असतो तो, थोडक्यात म्हणजे समाजाविषयी तळमळ असणारा व्यक्ति म्हणजे हा चौथ्या स्थळातिल प्राणलिंगी.
"लिंग तोची प्राण, प्राण तोचि लिंग ।
असे तो अभंग प्राणलिंग ।।"

५) शरण :-
      "जो विसरतो तो माणूस , आणि जो जाणतो तो शरण" या सोप्प्या शब्दांत शरणांची व्याख्या केल्या गेली आहे. जानिवांचा शिरोमणि म्हणजे शरण. समाजाविषयी कळकळ असणारा म्हणजे शरण, समाजासमोर काही विघ्न आल्यास जिद्दीने पेटुन उठनारा पण शरण. शरण स्थळाबद्दल लिहिताना या लेखात येथेच विराम देतो. कारण शरण म्हणजे अतिशय संवेदनशील बनलेल्या व्यक्तीची पायरी आहे. धर्मासाठी आपले तन मन धन अर्पण करणारा शरण याचाच गौरव आपल्या अभिवादनात केल्या जातो.

६) ऐक्य :-
      बसवन्ना म्हणतात लिंगायतांसाठी मरण हिच महानवमी आहे. लिंगायत धर्मातील सर्वांत महत्वाचे आणि सर्वोच्च स्थल म्हणून ऐक्यस्थळ ओळखले जाते , जिव आणि शिव एक होण्याची stage म्हणजे ऐक्यस्थळ .

- अविनाश यशके (8149760150)

Tuesday, June 2, 2015

कविता - बसवण्णा सर्वांसाठी

माझी ही छोटीशी कविता बसवण्णाला अर्पण

"बसवण्णा सर्वांसाठी"

दलितांच्या उत्थानासाठी,
स्त्रियांच्या कल्याणासाठी,
वचनांची निर्मिति केलि,
सर्वजनांच्या मानासाठी ।

रावहि आले रंकहि आले,
प्रत्येकाने कायक केले,
मार्ग दावीला तू बसवेशा,
जगताच्या कल्याणासाठी ।

अनुभव मंटप स्थापन केला,
समतेचा सन्मार्ग दाविला,
येथे अबला बनल्या सबला,
धर्माच्या सन्मानासाठी ।

आम्हासी शिवधर्म दाविला,
आप्तांचा स्वधर्म दाविला,
धर्म दाविला तू बसवेशा,
बहुजनांच्या कल्याणासाठी ।

कवी - अविनाश यशके (8149760150)

महात्मा बसवण्णाजी का लिंगायत धर्म आचरण संदेश

१) मनुष्य और मनुष्य के बीच जाती, वर्ण, वर्ग, आश्रम, कुल, गोत्र, उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य आदि के भेद-भाव नष्ट कर सारे संसार में मानव समता स्थापित होनी चाहिए ! यह मानव समता ही विश्व-बंधुत्व, विश्वप्रेम और विश्वशांति का आधार हैं !
२) जीवन के प्रत्येक क्षेत्र में स्त्री-पुरुषों को सामान अधिकार होने चाहिए !
३) प्रत्येक व्यक्ति 'स्वकायक ' द्वारा अपना और अपने परिवार का उदरपोषण करे !
४) सभी कायक समान सम्मान दृष्टि से देखे जाएँ !
५) परान्नसेवी शोषणवृत्ति और भिक्षाव्रत्ति का जनजीवन से पुर्णतः निष्कासन हो !
६) जाती-सूतक, जनन-सूतक, प्रेत-सूतक, रज-सूतक और उछिष्ठ-सूतक न मने जाएँ !
७) बहुदेवोपासना, भुतप्रेतों की पूजा और धार्मिक अंधविश्वास एवं पाखंड का पुर्णतः निर्मूलन किया जाएँ !
८) अविचार, अनाचार, दुर्भावना तथा तामसिक वृत्तियों को त्याग मानवसमाज सदाचार, सत्कर्म और सदधर्म का आचरण करे !
९) जनजीवन में मांसाहार, मद्यपान, जुआ खेलनेकी आदत, फसवेगिरी, विश्वासघात, क्रूरता पूर्ण कुकर्म, छल, कपट, इर्ष्या, द्वेष, वेश्यावृत्ति, हिंसाचार, एवम् अनीतिपूर्ण व्यवहार समाप्त हो !
१०) प्रत्तेक व्यक्ति अष्टमद, षडरिपु और इंद्रियजन्य विकारों से अलिप्त रहे !
११) भौतिक सुखों के पीछे भागने की अपेक्षा दासोह और लोकसेवा के लिए अपने जीवन का सदुपयोग करे !
१२) शोषण करना, शोषित होना अथवा शोषण करने में प्रत्यक्ष्य अथवा परोक्ष रूप से सहयोग देना - तीनों समान रूप से अपराध हैं !
१३) देहदेवालय में, हृदय के सिंहासन पर इष्टलिंग की प्रतिष्ठा करना सदभक्ति हैं !
१४) बसव-तत्व, लिंगायत-धर्म, शिव-आचार, शरण-संस्कृति, एवम् वचन-साहित्यानुरूप आचरण तथा इष्टलिंग, अष्ठावरण, पंचाचार एंव षड्स्थल आचरण के अनुभाव से हर कोयी शरण पद और लिंगांग-सामरस्य प्राप्त कर सकते हैं !
१५) प्रत्तेक व्यक्ति को सामाजिक, धार्मिक, आर्थिक एंव लोककल्याण के क्षेत्र में स्वतंत्र-चिंतन और स्वतंत्र - अभिव्यक्ति का अधिकार होना चाहिए !
१६) वैराग्य के नाम पर समाज से परागंमुख हो गिरी खंडरों में तपश्चर्या करना 'पलायन' हैं | गृहस्थ-जीवन जीते हुए शिवाचार का पालन करना पुरुषार्थ हैं, लिंगायत धर्म हैं !
१७) तर्क, प्रमाण, और अनुभाव द्वारा मुक्त-चिंतन से प्रत्येक व्यक्ति को स्वकल्याण का राजमार्ग प्राप्त हो सकता हैं !
१८) स्वकल्याण के बिना लोककल्याण नहीं हो सकता, अतः व्यक्तित्व के वैश्विक विकास के बिना, वैश्विक समानता संभव नहीं !

यही स्वाभिमानी लिंगायत धर्म संहिता हैं.!

साभार - लिंगायत सेवा संघ.