महात्मा बसवेश्वर बोलले आज ;
वेळ आहे का थोडा ?
चार शब्द सांगायचेत,
राहवत नाही म्हणून
काही जबाब मागायचेत !
आधी आभार मानतो
मोठं केलत मला
पण खरंच सांगतो तुम्ही
खोटं केलत मला !
अवघ्या तुमच्या जीवनात
व्यापून टाकलत मला
मनात सोडून सगळीकडे
छापून टाकलत मला !
नाव माझं घेतलत
सण माझे केलेत
माझे अनुयाई म्हणून
राडे सुद्धा केलेत !
एवढ्यावर थांबला नाहीत
मला देवासोबत बसवलत
वाईट वाटतंय म्हणताना
पण तुम्ही मला फसवलत !
माझे विचार घेतले नाहीत
माझे आचार घेतले नाहीत
चरित्र माझं ओरबाडलत
पण त्याचे सार घेतले नाहीत !
नुसते प्रताप आठवू नका रे
तत्व सुद्धा जपा
स्मारक पुतळे झगमग नको
माझे वचन जपा !
निष्ठा धैर्य न्याय नीती
तत्व माझी कुठे गेली ?
अरे तुम्ही सगळे माझेच ना
मग तुमची एकी कुठे गेली ?
काय नक्की साधायचंय
कशात भूषण आहे
हा विचार केला नाहीत
तर सगळंच कठीण आहे
स्वाभिमानात सामर्थ्य आहे
त्याच्या जागी माज नको
आणि आहे जिथे स्वाभिमान
तिथे मुळीच लाज नको !
असो; याहून काय सांगू
तुमचा काळ वेगळा आहे !
पण असे नका वागू ज्याने
मला वाटेल मी एकटा आहे ߙ!Ϡ
कवी - अनंत पाटील, मुरूम
(संपर्क-9096416141)
No comments:
Post a Comment