ANUBHAVA MANTAPA

ANUBHAVA MANTAPA

Tuesday, June 28, 2016

कविता - बसवण्णाच्या मार्गावरती सदैव आम्ही चालत राहू

आमचे विचार पेरणं मनात
थोडं अवघड आहे ।
आमचे विचार पेरणं  समाजात
हे पण अजुन अवघड आहे ।।
म्हणून हवा खंबीर मनाचा
मित्र आमुच्या साथिला ।
कारण एकट्या दुकट्याच्याने
हे सारं करणं  कठीण आहे ।।१।।

कारण आमच्या विचारांना
वचनांची धार आहे ।
कारण आमच्या विचारांना
शरणांचा हुंकार आहे ।।
अर्ध्या हळकुंडाने पिळवटलेला
नकोच आमच्या साथिला ।
कारण आमच्या विचारांना
फ़क्त जिद्दीचीच ढाल आहे ।।२।।

भले असेल कडवटपणा
आमच्या शब्दांत भिनलेला ।
भले असेल टिपुसभर जरी
वाचार्थ थोडासा रुसलेला ।।
मधुर अर्थ आमच्या शब्दांचा
ओळखणारा मित्र पुरे ।
लाखांच्या टोळीमधले षंढ
सोबत कधी नको बरे ।।३।।

मानेवरल्या कुप्रथांचे
जोखड आम्ही फेकून देऊ ।
विषवैखरी ज्वलंत साऱ्या
अन्यायांना छेदून जाऊ ।।
शिवशरणांच्या मार्गाला,
जीवनाशी संगत देऊ ।
बसवण्णांच्या मार्गावरती
सदैव आम्ही चालत राहू ।।४।।

      लिंगायत चळवळीतील जिद्दी युवकांच्या भावनांना वाट करून देण्याचा छोटासा प्रयत्न

- अविनाश यशके
(संपर्क -८१४९७६०१५०)

कविता - महात्मा बसवेश्वर बोलले आज - अनंत पाटील

महात्मा बसवेश्वर बोलले आज ;

वेळ आहे का थोडा ?
चार शब्द सांगायचेत,
राहवत नाही म्हणून
काही जबाब मागायचेत !

आधी आभार मानतो
मोठं केलत मला
पण खरंच सांगतो तुम्ही
खोटं केलत मला !

अवघ्या तुमच्या जीवनात
व्यापून टाकलत मला
मनात सोडून सगळीकडे
छापून टाकलत मला !

नाव माझं घेतलत
सण माझे केलेत
माझे अनुयाई म्हणून
राडे सुद्धा केलेत !

एवढ्यावर थांबला नाहीत
मला देवासोबत बसवलत
वाईट वाटतंय म्हणताना
पण तुम्ही मला फसवलत !

माझे विचार घेतले नाहीत
माझे आचार घेतले नाहीत
चरित्र  माझं ओरबाडलत
पण त्याचे सार घेतले नाहीत !

नुसते प्रताप आठवू नका रे
तत्व सुद्धा जपा
स्मारक पुतळे झगमग नको
माझे वचन जपा !

निष्ठा धैर्य न्याय नीती
तत्व माझी कुठे गेली ?
अरे तुम्ही सगळे माझेच ना
मग तुमची एकी कुठे गेली ?

काय नक्की साधायचंय
कशात भूषण आहे
हा विचार केला नाहीत
तर सगळंच कठीण आहे

स्वाभिमानात सामर्थ्य आहे
त्याच्या जागी माज नको
आणि आहे जिथे स्वाभिमान
तिथे मुळीच लाज नको !

असो;  याहून काय सांगू
तुमचा काळ वेगळा आहे !
पण असे नका वागू ज्याने
मला वाटेल मी एकटा आहे ߙ!Ϡ

कवी - अनंत पाटील, मुरूम
(संपर्क-9096416141)